Sunday, December 26, 2010

व्हेज बिर्याणी

मी केलेल्या कोणत्याही पदार्था बद्दल पहिल्यांदाच लिहितोय.
खरेतर भाताच्या या प्रकाराला व्हेज बिर्याणी म्हटले पाहिजे असे काहि नाहि. रेसिपी बिर्याणीची आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्यात थोडे फ़ेरफ़ार केले आहेत.

साहित्य:
भातासाठी:
१. २ वाटी बासमती तांदुळ,
२. १ वाटी फ़ुलकोबी
३. १ किसलेले गाजर,
४. १/२ वाटी मटार,
५. २-३ फ़रसबी तोडुन त्याचे तुकडे करुन घ्या
६. १/२ बटाट्याचे तुकडे

ओला मसाला:
१. ३-४ हिरव्या मिरच्या
२. ३ पाकळ्या लसुण
३. थोडेसे आले (आले म्हणजे अद्रक)
४. १/२ लहान कांदा

कोरडा मसाला
१. २-३ लवंग
२. दालचिनी पावडर
३. जीरा पावडर
४. धणे पावडर
५. हळद
६. तिखट
७. गरम मसाला

इतर साहित्य
१. मीठ
२. दीड वाटी दही
३. १ कॅरमलाईज़्ड कांदा. (कॅरमलाईज़्ड याला मराठी प्रतिशब्द काय आहे?)

कृती:
१. फ़ुलकोबी, गाजर, वाटाणा,फ़रसबीचे तुकडे, बटाट्याचे तुकडे अर्धकच्चे शिजवुन घ्यावे.
२. तांदुळाच्या अडिचपट पाणी घेउन त्यात तांदुळ घालावे. वरुन झाकण ठेवुन तांदुळ शिजवावा. उरलेले पाणी काढुन टाकावे. तयार भात परातीत मोकळा करुन ठेवावा.
३. ओला मसाला :
   मिरच्या, लसुण, कांदा, अद्रक एकत्र करा. त्यात २ चमचे दही घालावे आणि हे मिश्रणा वाटुन एकजीव करावे.
४. एका भांड्यात थोडे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात ओल्या मसाल्य़ाची पेस्ट टाकुन परतावे.
५. पेस्ट गुलाबी रंगावर परतुन त्यामध्ये लवंग, १/२ टीस्पून दालचिनी पावडर, १ टीस्पून जीरा पावडर,
 १ टीस्पून धणे पावडर, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून गरम मसाला घालावा.
 १ मिनीट परतुन घ्यावे.
६. दीड वाटी दही आणि अर्धकच्च्या भाज्या घालुन २ मिनीट शिजवावे.
७. भात आणि कॅरमलाईज़्ड कांदा त्यात घालावा. सगळे पदार्थ व्यवस्थीत एकत्र करावेत.
८. २ मिनीट वाफ़वुन घ्यावे.
  बिर्याणी तयार.

कांदा कॅरमलाईज़्ड कसा करावा?
१. कांद्याचे उभे बारीक काप करावे. 
२. तव्यावर थोडे (२-३ चमचे) तेल घालावे. तेल तव्यावर सगळीकडे पसरेल याची काळजी घ्या.
   तेल गरम झाले कि त्यावर कांदा परतवावा.
३. कांदा थोडा परतल्यावर २ चिमटी मीठ आणि १/२ टीस्पून साखर घालावी.
४. कांदा चांगला लालसर रंगावर परतुन घ्यावा.

Sunday, December 19, 2010

विलासरावांचा हस्तक्षेप

प्रिय गण्या,
बरेच दिवस झालेत तुझे पत्र नाही. राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यात. काही काम न करता अधिवेशन पण संपले.  निराबाई, २ जी, राष्ट्रकुल या सगळ्या चौकश्या सुरु राहतील.
सध्या दिवस एकदम ’निरामय’ आहेत. निरा राडिया, निरा यादव. कोणत्याही बातम्या लावा यातले एक तरी नाव कानावर येतेच.
तिकडे हिवाळी अधिवेशनात काम झालेच नाही. इकडे नागपुरला मात्र सध्या दिल्लीकर असलेले अवघड, चुकले अवजड उद्योग मंत्री, चर्चेत होते. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्च न्य़ायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड केला. विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या आमदाराच्या वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवुन घेतली जाऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव आणला होता.विदर्भातल्या खामगावचे आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे वडील गोकुळचंद सानंदा हे व्यवसायाने सावकार आहेत. ज्या काळात देशमुखांचे सहकारी गृहमंत्री आर.आर. पाटील सावकारांना कोपरापासुन ढोपरापर्यंत सोलुन काढायची भाषा करत होते, त्याच काळात हे सावकार सामान्य शेतकऱ्यांना महिना दहा टक्के दराच्या व्याजाच्या बोलीवर कर्जवाटप करत होते.  त्या शेतकऱ्याला मासिक १० टक्के या दराने व्याज लावण्यात आले; म्हणजे वार्षिक १२० टक्के व्याज. हा व्याजाचा दर कोणाचेही कंबरडे मोडेल असाच आहे.
विदर्भात त्यावेळी ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यातल्या बहुतेक शेतकऱ्यांच्या मृत्युला हे असलेच लोभी, धनदांडगे सावकार कारणीभुत आहेत.

आता शासन करदात्यांनी दिलेले १० लाख रुपये दंड भरणार. 
मला सांग गण्या, ही दंडाची रक्कम आपण का भरायची, मर मर करुन पैसा कमवा, सरकारला प्रामाणिकपणे कर द्या. आणि तोच पैसा हे आपल्या कर्मदारिद्र्याने घालवणार. खरे तर देशमुख, सानंदा या जोडगोळी कडुन हा दंड वसुल करायला हवा. संपत्ती जप्त करुन तिचा लिलाव करा आणि ते पैसे शेतकऱ्यांना द्या.  एक शेतकरी हिम्मत करुन न्यायालयात गेला, तेथवर न गेलेले किती असतील कुणास ठावुक.  ह्या राजकारण्य़ांनी महाराष्ट्राचे नामकरण महाभ्रष्ट करण्याची सुपारी घेतली आहे. 
विलासरावांवर तर वेगळा खटला भरावा इतके हे वाईट आहे. 
१. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना ’निष्पक्षपणे काम करीन’ अशी शपथ घेतात, त्या शपथेचा त्यांनी भंग केला.
२. आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केला आहे, हे स्पष्ट झाले 
३. त्यांचे सहकारी ज्या वेळेस सावकरांना फ़ोडुन काढायची भाषा बोलत होते तेव्हा हे मात्र सावकारांना संरक्षण देत होते. आपल्याकडे असलेल्या कायद्यानुसार खासगी सावकारी हा शिक्षापात्र गुन्हा  आहे. म्हणजे तसेही पाहिले तरी गुन्हेगाराला पाठीशी घालायचेच काम देशमुखांनी केले आहे
४. इतकेच नव्हे तर ते राज्यघटनेत असणाऱ्या ‘समानतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वाविरुद्ध वागले’’, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी आणि ए.के. गांगुली यांच्या पीठाने म्हटले आहे.

 सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण भरपुर चिखल अंगावर उडवुन घ्यायचा असे ठरवले आहे हे दिसते. ते १०५ हुतात्मे, प्रबोधनकार, अत्रे, डांगे, एस.एम वगैरेंना हे पाहताना काय वेदना होत असतील हे त्यांनाच माहित.
 असो, तू आहेस तिथेच सुखी रहा, महाराष्ट्रात परतण्याची घाई करु नकोस.  परत ये म्हणत नाही याची कारणे वर दिली आहेतच.
सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रातला,
अम्या.

Wednesday, December 01, 2010

नवस

"काय तर ही बया, कानामागुन आली आणि तिखट झाली. जॊ येतो तो हिचीच चौकशी करतो." लाल हिरवीला म्हणाली.
"असेच असते इथे, नवी कोणी आली कि तिचाच गाजावाजा असतो, सगळे तिलाच विचारतात. जुनी झाली कि येइल आपल्यात." हिरवीने समजुतदारपणा दाखवला. "पण ती एकटीच थोडी ना आली असेल. कोणी असेल ना सोबत." उजवीने मधेच नाक खुपसले. "कोणी तरी येणार होती कोकणातुन पण येथवर पोहचली नाही वाटते अजुन. त्यामुळे हिच सगळ्य़ात नवी. शिवाय ’आदर्श’ घरातली, म्हणुन मागणी जास्त. पार दिल्ली पासुन लोक आलेत येथवर हिच्यामुळे." हिरवीने माहिती पुरवली.
"मी तर काल ऐकले कि, ज्यांचे नाव हिच्यासोबत आले ते तर घरी गेलेच, पण ज्यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही अश्या लोकांना पण ही भोवली." उजवी सांगु लागली; तिला तोडुन हिरवी परत मधेच म्हणाली,"तु तरी कोठे कमी होती, तुझ्यामुळे पण १-२ जण घरी गेले होते. इथे येताना सगळे असेच असतात. मी पण येथे येताना फ़ार गोंधळ घातला होता; मोठी उलथापालथ केली होती पण शेवटी नशिबात तुमचीच सोबत होती." लाल परत म्हणाली,"एवढी डिमांड असताना ही का नाराज?"

त्या तिघी जणी बोलत असताना, ती मात्र आपल्याच विचारात होती,"काय चुकले माझे? भल्या भल्या धेंडांना धक्का दिला, हे? का म्हणुन माझ्यासोबत त्याने इतक्या निष्ठुरपणे वागावे? का माझे असे तुकडे करावे त्याने? मी त्याचे काहिहि नुकसान केले नव्हते. माझे लचके तोडताना त्याला काहिच कसे वाटले नाही? छे! आता तर माझी किंमत पण कमी झाली, ती लाल तर आधीच जळते माझ्यावर, हे सगळे जर तिला कळले तर हसेल ना ती फ़िदिफ़िदि. असे नाही जमणार काहिहि करुन ती चार पानं मिळवावे लागतील."

इतक्यात कोणाची तरी चाहुल लागली म्हणुन सगळ्या सावरुन बसल्या. पाहिले तर पाटिल साहेब आणि महादु आले होते.
"महाद्या, अरे आदर्श चे ४ पानं गहाळ झालेत. क्राईम ब्रँच वाले येणार आहेत, एन्क्वायरी करायला. चल आटप लवकर. सगळे जरा आवरुन घे. ह्या एन्रॉन, अण्णा आणि दादा च्या फ़ाईली समोर कशाला, जरा कोपऱ्यात सरकव त्या. ती आदर्श ची फ़ाईल समोर काढुन ठेव. त्यांना द्यायची आहे."

पानं गहाळ झाल्याचे ऐकुन त्या तिघींनी निश्वास सोडला, हिरवी म्हणाली,"एक आणखी सोबत, चला तिला लाल च्या बाजुला जागा देऊ."

क्राईम ब्रँच एन्क्वायरी करणार हे ऐकुन तिची कळी पटकन खुलली, "चला, म्हणजे पानं मिळु शकतात तर. म्हसोबा, माझे पानं मला मिळवुन दे रे बाबा. असे झाले तर २ कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा वाहिन तुला."

Wednesday, November 24, 2010

मुख्यमंत्र्यांचा दिवस

भारताच्या राजकारणात कालचा दिवस मुख्यमंत्र्यांचा ठरला. बिहारातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने विक्रमी बहुमत मिळवत एकछत्री अंमल प्रस्थापित केला.
कॉंग्रेस, राजद-लोजपा यांचा धुव्वा उडवत परत एकदा नितीशकुमारांनी सत्ता मिळवली आहे. भाजप हा नितीशकुमारांचा (जद(सं)) सत्तेतील भागीदार. कॉंग्रेस ची संख्या ९ वरुन ४ झाली. लालुप्रसादांच्या कंदिलाचा प्रकाश मंदावला आहे. त्यांचे संख्याबळ ४३ चे २२ झाले. रामविलास पासवानांचे तर फ़क्त ३ उमेदवार निवडुन आलेत. कॉंग्रेस, राजद-लोजपा यांना अस्मान दाखवुन सत्ताकारणात ’विकास’ हा महत्वाचा मुद्दा आहे हे बिहारी जनतेने जाणवुन दिले आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांनी यातुन काय तो बोध घ्यावा.

आंध्रात रोसय्या गेले; किरण रेड्डी आले
प्रकृतीचे कारण देत आंध्र प्रदेशात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री रोसय्या यांनी राजीनामा दिला. जगनमोहन यांना मुख्यमंत्री पदाची असलेली घाई, आधी अम्मा असा ज्यांचा उल्लेख केला त्या सोनिया गांधींवर जगनमोहन यांच्या साक्षी वाहिनीने टिका केली. आधीच जगनमोहन यांना फ़ारसे अनुकुल नसलेले मत त्यांच्या विरोधात गेले. रोसय्यांची गच्छंती त्यांच्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे झाली. रोसय्याचे उत्तराधिकारी म्हणून विधानसभा अध्यक्ष किरणकुमार रेड्डी यांचे नाव निश्‍चित झाले.

कर्नाटकात येदियुरप्पा राहिले
कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्यापुढे नमायला लावून मुख्यमंत्रीपद शाबूत राखले आहे. येदियुरप्पा हे सरकारी भूखंडाचे नातेवाईकांना केलेल्या वाटपावरून अडचणीत आले होते. त्यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्याचे संकेत भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पण येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपद टिकवले आहे.
पहिला दक्षिण दिग्विजय मिळवुन देणाऱ्या सुभेदाराने आपला स्वतंत्र सवतासुभा निर्माण केल्याचे स्पष्ट झाले.
'A party with a difference' असलेला भाजप ने आपले पाय मातीचेच आहेत परत एकवार दाखवुन दिले.

Sunday, November 21, 2010

मा. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मा. मुख्यमंत्री साहेबांनी केवळ मराठी मधुनच पत्रकार परिषद घेण्याचे जाहिर केले आहे. मा. मुख्यमंत्र्यांचे या निर्णयासाठी अभिनंदन.
यापुढे कारभार मराठीभिमुख होईल अशी काही समजुत करुन घेण्यात अर्थ नाही. त्यासाठी सत्तेच्या आणि अर्थकारणाच्या चाव्या ज्या वर्गाच्या हातात आहे त्यात मराठी भाषा बोलणारा टक्का वाढायला हवा.
ता.क. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवुन हा निर्णय घेण्यात आला नसेल अशी अपेक्षा आहे.

Thursday, November 18, 2010

दगा...

हे एका कवितेचे विडंबन आहे, ३-४ वर्षापुर्वी केलेले. आज अचानक हे विडंबन हाती लागले. मुळ कविता आठवत नाही.

आठवतं तुला त्या भेटीत,
खेटरांनी तिने तुला सडकले होते,
भर दुपारि तुला जणु,
चांदणेच तिने दाखविले होते.

आठवतं तुला त्या भेटीत,
भाऊ तिचा भडकला होता,
ऒल्या ऋतुत, ओल्या वेताने,
तुझा देह रक्ताळला होता.

आठवतं तुला त्या भेटीत,
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझ्या जखमा बांधता बांधता,
मी पुरता वैतागलो होतो.

आठवतं तुला त्या भेटीत,
भावनांनी कविता रचली होती,
आणि न वाचताच तिने,
कविता dustbin मधे फ़ेकलि होती.

आठवतं का तुला नंतर
गम्मत काय झाली होती,
मला मात्र स्मरत नाही,
कारण ती माझ्या बाहुपाशात होती.

Friday, November 05, 2010

हॅलोवीन

दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी हा ’हॅलोवीन’ सण युरोप, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये हा सण साजरा करतात. या सणाला आपले पूर्वज परत येतात असे मानल्या जाते. त्या प्रित्यर्थ भोपळ्याचे वेगवेगळे आकार बनवतात. आम्ही पण भोपळ्य़ापासुन स्माइली बनवला.









Saturday, October 16, 2010

राष्ट्रकुल

प्रिय गण्या,

दिल्लीला जावुन आलो तेव्हापासुन तब्येत जरा नाजुक झाली आहे. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा पहायला गेलो होतो. १९८२ नंतर प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम भारतात आयोजीत केल्या गेला. म्हटले बघावे कसा होतो ते. पावसाने धिंगाणा घातला होता, ऐन स्पर्धा तोंडावर आली आणि हा पाऊस. निसर्गाचे हे तंत्र तर आपले क्रिडामंत्री गिलसाहेब एकदा जाहिरपणे बोलले कि राष्ट्रकुल साठी खर्च जास्त होतोय. तुला सांगतो गण्या, हे म्हणजे कार्य भरात आले असताना मुलीच्या मामाने रुसुन बसावे तसे झाले. त्यानंतर केंद्रिय दक्षता आयोगाने गिल साहेबांची री ओढत खर्चावर कडक ताशेरे ओढले आणि मग कलमाडी आणि मंडळींच्या नावाने सगळ्यांनी बोंब ठोकली. माध्यम आणि विरोधक कामाला लागली. राष्ट्रकुलच्या भ्रष्टाचाराचे किस्से आम आदमीला कळु लागले.
बालपणी ऐकलेल्या अरेबियन नाईट च्या १००१ सुरस आणि चमत्कारिक कथा म्हणजे यापुढे किस झाड कि पत्ती. अबे, १६०० रुपयचा पेपर ’पुसण्यासाठी’, असे बरेच चमत्कार समोर आलेत. (तो न वापरलेला पेपर एकदा पहावा, असे फ़ार मनी होते, पण तो फ़क्त खेळाडुंसाठीच आहे असे कळले) आजवर झाल्या नसतील अश्या स्पर्धा भरवुन दाखवु हि दर्पोक्ती कलमाडी खरी करणार अशीच परिस्थीती निर्माण झाली होती. स्टेडियम जवळचा पुल कोसळला, कोठे नागराजाने दर्शन दिले, कोण्य़ा खेळाडुचा पलंग तुटला. शेवटी काही पर्याय शिल्लक राहिले नाही हे पाहुन पंतप्रधानांनी परिस्थीती ताब्यात घेतली. आपल्या संयोजन समितीच्या कारनाम्यांमुळे खालच्या मानेने जगापुढे जाण्याची नामुष्की आली. हे सगळे कमी म्हणुन की काय दिल्लीत पर्यटकांवर झालेला गोळीबार.
पण एकदाच्या स्पर्धा सुरु झाल्या आणि भारताचे संयोजन तावुन सुलाखुन निघाले. सगळ्या परिक्षामधे खरे उतरले. आपल्या यजमानपदाची बूज राखल्या गेली.

उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाने पारणे फ़ेडले. यशस्वी संयोजनासाठी भारताच्या वाट्याला कौतुक आले. आपल्या खेळाडुंनी पदक तालिकेत दुसरा क्रमांक मिळवला म्हणजे सोने पे सुहागा. १०१ पदक. त्यात ३८ सुवर्ण. स्वप्नवत वाटते रे!! अजीबातच अपेक्षा नव्हती. क्रिकेट शिवाय आपण काही खेळतो हे वेळेस पहिल्यांदा कळले. लोक हॉकी आणि बॉक्सिंग चे सामने पहायला गर्दी करत होते. नेमबाज, धनुर्धर, बॉक्सर पदकांची लयलुट करुन आले. त्या सगळ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
गेल्याच आठवड्यात परत आलोय. एकदा तो १६०० रुपड्याचा ’पुसण्य़ाचा’ पेपर पहावा म्हणुन खेळाडुंच्या होस्टेल मध्ये जाण्य़ाचा प्रयत्न केला. पण आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत, मध्येच त्यांच्या तावडीत सापडलो. असो अंग ठणकते आहे.

लेखन सीमा.
-अम्या.

ता.क.- दिल्लीस गेला कधी तर सुरक्षा व्यवस्थे पासुन जपुन.

Wednesday, October 13, 2010

आता कायम सदस्यत्व हवे.

तब्बल एकोणीस वर्षांच्या कालखंडानंतर भारत सुरक्षा समितीचे सदस्यपद भूषवीत आहे. आमसभेत 190 पैकी 187 सदस्यांनी भारताला पाठिंबा दिला. अस्थायी सदस्यपदासाठी झालेले हे उच्चांकी मतदान आहे. ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे. जागतिक पातळीवर गेल्या काही वर्षांत भारताने बजावलेल्या भूमिकेवर जागतिक समुदायाने उमटवलेली ही मान्यतेची मोहोर आहे.

तो भारताचा अधिकार आहे. सध्या अमेरिका, इंग्लंड, फ़्रान्स, रशिया आणि चीन हे सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आहेत.भारत लोकसंख्येत चीन खालोखाल आहे. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारताची आर्थिक स्थिती इंग्लंड, फ़्रान्स आणि रशिया पेक्षा उत्तम आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दादा आहे.
भारताने स्वबळावर चांद्रमोहिम हाती घेउन ती पार पाडली आहे. DRDO, इस्त्रो यांचे नाव जगात आदराने घेतले जाते. आर्थिक उदारिकरणानंतर भारतीय उद्योग जागतिक स्तरावर पोचले.

भारत हे एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी संबंध तोडल्यावर सुद्धा भारताने कोणासहि अणुतंत्रज्ञान दिले नाही.


भारताचे सैन्य हे नागरी शक्तीच्या ताब्यात आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेमध्ये ५०००० पेक्षा अधिक भारतीय सैनिक आहेत. भारताचे धोरण आक्रमक नाही. अमेरिकेने उजाड केलेल्या अफ़गाणिस्तानमध्ये भारत महत्वपुर्ण विकासकामे करत आहे.
मालदीवला लष्करी मदत करुन तेथील बंडाळी भारतीय सैन्याने मोडुन काढली. बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवुन देताना पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. आशिया खंडात आणि एकुणच जागतिक स्तरावर भारत महत्वपूर्ण भुमिका बजावत आहे.