Monday, April 28, 2008

गाण्यातले झाड

...आणि मग कुमार गंधर्व बागेश्री रागात गाउ लागतात ’टेसुल बन फ़ुले’ - हरेकृष्णजी. माझ्या मागच्या लिखाणावर हरेकृष्णजी यांची ही प्रतिक्रिया. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, हरेकृष्णजी.
प्रतिक्रिया वाचुन मी विचार केला कि बघुयात तर पलाश शिवाय इतर कोणते वृक्ष गाण्यामध्ये आले आहेत?
मिळालेली उत्तरे भन्नाट आहेत, पुर्ण नाहीत; पण intersting आहेत. बालपणातले कौतुक सगळ्य़ात जास्त आहे ते निंबोणीला ’निंबोणीच्या झाडामागे...’ हे तर घराघरातल्या मायमाऊलीचं आवडतं अंगाई गीत.
या अंगाईगीताचा वापर करुन बऱ्याचदा बाबा लोक पण आपला गळा साफ़ करुन घेतात;निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला चांदण्याला नीज आली,तरीही नंदलाला झोपत नाही
(बाबांनी गायल्यावर झोप येण्यापेक्षा उडण्याचीच शक्यता अधिक) हे पाहुन रातराणीच्या गंधाचा आसरा घ्यावा लागतो,
सावल्यांची तीट गाली, चांदण्याला नीज आली रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे, नीज माझ्या नंदलाला रे॥
कोणी बच्चे कंपनीला बोलावते, ’या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फ़ुले वेचुया’ आणि कंपनी मोराला आंब्याच्या वनात नाचायला सांगते.
तर कोणी माहेरवाशिण आपले बालपण आठवताना सांगते, बकुळी माझी सखी जिवाची जन्मांतरीचे प्रेम जुने,
मला पाहता फ़ुलते ती अन तिला पाहता मी ही फ़ुलते.
शब्द हे अक्षर असतात. अक्षर म्हणजे कधीही न भंगणारे. इच्छेविरुद्ध निरोप घ्यायचा प्रसंग आला तर कोणितरी आठवण म्हणुन शब्दच जपुन ठेवायला सांगतय,
’शब्द शब्द जपुन ठेव, बकुळीच्या फ़ुलापरी’ एखाद्याला देण्यासाठी यापेक्षा अमिट भेट ती काय असणार?
प्रियकर प्रेयसीला ऐकवतो, ’दुरच्या रानातल्या बकुळीच्या तळी, प्रितीची गीते किती प्रिये रंगली पहा.’
बकुळ जसे सतत आनंदात आहे तसे चाफ़्याचे मात्र नाही, तो खंत करतोय कसली तरी:
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी; काही केल्या फुलेना. लतादिदिंनी गायलेल्या या गीतात कवि ’बी’ चाफ़्याला फ़ुलविण्यासाठी केतकीच्या बनी घेउन गेले, आंब्याच्या वनात नेउन मैनेसवे गाणी म्हटली, तेव्हा कोठे चाफ़ा फ़ुलला.चाफ़्याच्या संदर्भातलं आणखी एक गीत मला मिळाल ते गदिमांच मालती पांडेंच्या आवाजातल,
लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छ्पेल का?
प्रीत लपवुनी लपेल का ?
मोगरा पण दोन गीतांमध्ये दरवळतो. ज्ञानेश्वरांचा ’मोगरा फ़ुलला’ तर गदिमांना पडलेला प्रश्न ’का मोगरा फ़ुलेना?’.
एका नवयौवनेला सावध राहण्याचा सल्ला देत कवी म्हणतो ’केतकीच्या बनात उतरत्या उन्हात सळ्‌सळ्‌ पानात जपून जा जपून जा गडे जपून जा कुठे निघेल नाग’ आणि त्याच वेळेस जगाची रीतभात जाणुन असलेली कोणाला सुनावीत असते ’चिंचा आल्यात पाडाला हात नको लावूस झाडाला माझ्या झाडाला !माझ्या नजरेत गोफणखडा पुढं पुढं येसी मुर्दाडा काय म्हणू तुझ्या येडाला ?’नाहीतर ’मी लवंगी मिरची कोल्हापुरची’ असे ठसक्यात सांगत असते. शहरी भागात दारोदार दिसणारा गुलमोहर वसंतात फ़ुलतो. आणि त्याच्या फ़ुलण्य़ाने कुणी अभिसारीका आपल्या प्रियकराच्या आठवणीने गाउ लागते ’अंगणी गुलमोहर फुलला....वसंत आला, याल तुम्हीही, कोकिळ कुजबुजला’ प्रीतीची किमयाच न्यारी, तेथे ’दगडांच्या देशा’ असलेला महाराष्ट्र, नंदनवन काश्मिर वाटु लागतो आणि चिंचेचे झाड चिनार दिसु लागते. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !
Jealousy thy name is woman सिद्ध करणारी महाभारतातली पारिजात आणि सत्यभामेची कथा तशी सर्वज्ञात तीच कथा गदिमा कवितेत रचतात बहरला पारिजात दारी फुले का, पडती शेजारी कवि अनिल,’किती जरी घातले पाणी, सावली केली केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली’ असे सांगत आपण नेमके कोठे जात आहे यावर भाष्य करतात.

जाता जाता:
माळ्याच्या मळ्यामंदी... अशी सुरुवात असलेले दोन गाणे आहेत
दादा आणि उषा चव्हाण यांचे माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी... आणि साधी माणसं मधील माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पानी जातं.
दादांच्या गाण्याची सुरुवात जरी माळ्य़ाच्या मळ्यामंदी अशी असली तरी नंतर गाण्यात झाडाचा काही उल्लेख नाही.
आणि साधी माणसं मधील माळ्याच्या मळ्यामंदी या गाण्यात माहेरची ओढ फ़ार छान लक्षात येते.
पण अस्सल मळेवाल्याचे वाटावे असे गीत आहे अवधूत गुप्तेचे काळी माती ....हिरवे शिवार. या गाण्यात सगळ्य़ात छान पद्धतीने भाज्यांचा उल्लेख असावा.
मिरचीचा तोरा, काकडीचा बांधा, लिंबावानी कांती, मुळावानी रंग गोरा गोरा, टमाटयावानी गाल, भेंडी वानी बोटं हे ऐकल्यावर मंडईत सुद्धा कसले सुख आहे हे कळतं.

Sunday, March 23, 2008

पळस

शिशिराची थंडी ओसरायला लागली. पानगळीने उघडी झालेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली. आणि कोकीळ गाउ लागला "तो आलाय, तो आलाय." yes तो कुसुमाकर, ‌ऋतुराज वसंत आलाय, आता यापुढील २ महिने फ़क्त रंगांची उधळण, रंगाचा उत्सव, वसंतोत्सव.
शिशिरात बोडक्या झालेल्या रानाला केशरी रंगात न्हाउ घालतो तो पळस,सायब तर त्याच्या गर्द केशरी रंगाला ’Flame of the fire' म्हणत आदर देतो.
वसंत आगमनाची वर्दी देतो तो गर्द केशरी पळस. तोच तो तीनच पाने असलेला Leguminosae/Faboideae/Papilionaceae परिवाराचा सद्स्य.
Leguminosae प्रजातीमध्ये सर्वाधिक सदस्य आहेत Faboideae या उपप्रजातीचे.यालाच Papilionaceae असेही नाव आहे. Leguminosae परिवार हा त्याच्या तैलिय फळांसाठी प्रसिद्ध आहे. मटार आणि शेंगा याच प्रजाती मधे मोड्तात. Faboideae म्हणजेच Papilionaceae प्रजातीला नाव दिलेय ते त्याच्या फुलांच्या आकारामुळे. papilionate म्हणजे फ़ुलपाखराच्या आकाराचा.
अरे तर आपला मुळ मुद्दा पळस: पळसाला अनेक पर्यायी नावे आहेत. गुजराती मध्ये खाकडा, तर तमिळ्मध्ये पोरासुम; प्रत्येक फांदीवर लगडलेला लाल फुलांचा घोस पाहुन जंगलाला आग लागली असावी असेच वाटते म्हणुन सायब याला Flame of the forest म्हणतो, याची फ़ुले पोपटासारखी दिसतात म्हणुन याला english मध्ये Parrot Tree असेही म्हणतात. त्याला हिंदी भाषेत ढाक किंवा तेसु असे म्हणतात.
संस्कृत मधे पळसाला पलाश म्हणतात, पलाश या शब्दाचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा आहे. बंगाली भाषेत हा शब्द जसाच्या तसा आला आहे.
२०-४० फ़ूट उंच होणाऱ्या या झाडाचे मुळ भारतातलेच.
या झाडाची एक दुर्मिळ पिवळ्या रंगाची जात फ़क्त भारतात आढळते.
हा पळस देवाधर्माच्या कामातही आपला आब राखुन आहे. सरस्वती आणि काली या दोन्ही देवींच्या पुजेत याच फ़ूलाला मान आहे.
तर लग्न कार्यात लागणाऱ्या पत्रावळी आणि द्रोण याच्याच पानांपासुन बनविले जातात. (आताशा plastic चे असतात, पण अजुनही ग्रामीण भागात पळसाचेच पत्रावळी आणि द्रोण वापरतात)पळसाला एप्रिल-मे महिन्यात पाने येतात. मौंजीमध्ये बटुच्या हातात पळसाचीच शाखा दिली जाते.
आयुर्वेदात पळसाचा वापर आतड्यांच्या विकारांवर होतो.


संदर्भ : १. http://www.toptropicals.com/html/toptropicals/articles/trees/butea.htm
२. http://www.ecocam.com/species/Faboideae.html
३. http://www.revolutionhealth.com/drugs-treatments/ayurveda?ns_page=3
४.http://www.rockyroephotographics.com/gallery/logo.php?picturename=albums/userpics/thumb_flame_of_the_forrest2.jpg
५. http://www.plantcreations.com/images/Flame%20of%20the%20Forest%203226c.JPG

Sunday, March 02, 2008

एका पुलाच्या निमीत्त्याने......

द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय....



THIS BRIDGE
WAS DESIGNED AND CONSTRUCTED BY
SOLDIERS OF THE BRITISH ARMY
FEB - MAY 1943
Lt. COL. L. NICHOLSON D.S.O. COMMANDING

७ ऑस्कर विजेता १९५७ साली प्रदर्शित झालेला हा सत्य घटनेवरचा एक छान चित्रपट. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान १९४२-४३ मधली घटना. थोडक्यात कथानक...

जपान्यांना बँकाँक - रंगून रेल रोड (पक्षी: लोहमार्ग) बांधताना एका टप्प्यावर क्वाय नदीवर पूल बांधायचा आहे. पूलाची जबाबदारी ज्या जपानी छावणी कडे आहे तिचा प्रमुख आहे कर्नल सायटो (सेसुई हायाकावा). त्याच्या छावणी मधे जे नविन ब्रिटीश युद्धकैदी आणले जातात त्यांना तो पूल बांधायला सांगतो. या युद्धकैद्यांचा प्रमुख आहे कर्नल निकोलस (एलेक गिनीस). कर्नल सायटो ब्रिटीश युद्धकैद्यांना कामाला जुंपतो. कर्नल सायटो ब्रिटीश अधिकाऱ्यांना सुद्धा कष्टाची कामे करण्याची आज्ञा देतो आणि त्याला कर्नल निकोलस विरोध करतो कारण जिनीव्हा करारानुसार अधिकाऱ्यांना कष्टाची कामे सांगता येत नाहित. चिडलेला सायटो निकोलस आणि त्याच्या अधिकाऱ्यांना इतर युद्धकैदी पासुन वेग्ल्य अश्या छळ कोठडीत डांबतो. निकोलसला तो एका जेमतेम एक माणुस मावेल इतक्या छोट्या टपरी मधे कोंडुन ठेवतो. निकोलस तरीही बधत नाही. एकीकडे निकोलस बधत नाही, ब्रिटिश युद्धकैदी जपानी अधिकाऱ्यांना धूप घालत नाही, दुसरीकडे कामाची डेड्लाईन जवळ आलेली. शेवटी सायटो माघार घेतो आणि निकोलस त्याच्या अधिकाऱ्यांनासह पुलाचे काम ताब्यात घेतो.
या छावणीतून अमेरिकन युद्धकैदी शिअर्स (विल्यम होल्डेन) पळुन जातो आणि ब्रिटिश सैन्य़ाच्या ताब्यात सापडतो. ब्रिटिश शिअर्सच्या मदतीने पूल उडवायची योजना आखतात.
त्यासाठी ब्रिटिश मेजर वार्डनच्या नेत्रुत्वाखाली अमेरिकन खलाशी शिअर्स आणि काही ब्रिटिश छापामार पुल उडवायला निघतात. इकडे पुलाचे काम जोरात सुरु असते. निकोलस आपल्या सैन्यात परत एकदा शिस्त आणतो आणि पुलाचे काम पुर्ण करतो. पुलावरुन जेव्हा पहिली गाडी जाईल तेव्हा पुल उडवायचा वार्डनचा कट असतो. त्यासाठी ते पुलाखाली सुरुंग पेरतात.
गाडी जायच्या थोडा वेळ आधी निकोलसला सुरुंगाची तार दिसते आणि तो तिचा माग घेत सायटोसह जातो. सुरुंग ब्रिटिशांनी पेरला आहे हे कळल्यावर निकोलस गोंधळतो, राष्ट्रनिष्ठा कि आपल्याच सैनिकांनी रात्रीचा दिवस करुन तयार केलेला पुल यातील कशाला महत्व द्यावे हे त्याला कळत नाही, पुलावरुन गाडी जात असते नेमका त्याच क्षणी ब्रिटिश अधिकारी वार्डनने फ़ेकलेल्या बॉंब ने जखमी होवून निकोलस सुरुंगाच्या खटक्यावर पडतो आणि पुल ध्वस्त होतो.
शत्रुच्या हाती सापडतील या भीतीने साथीदारांना मारावे लागले म्हणुन वैतागलेला मेजर वार्डन मॉर्टर लॉंचर फ़ेकुन देतो आणि युद्धाची निरर्थकता दाखवत चित्रपट संपतो.
चित्रपटाची पटकथा बेतली आहे, पीअरे बाउलो लिखीत(Pierre Boulle)द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय नामक फ़्रेंच कादंबरीवर.
१९४२-४३ मध्ये घडलेल्या घटनेचा नायक होता ब्रिटिश लेफ़्टनंट कर्नल फिलीप तुसे (Philip Toosey). प्रत्यक्षात पुल बनवायला ८ महिने लागले होते. पुल सुद्धा २ बनवले होते आणि ते पुल २ वर्ष वापरण्यात आले.

चित्रीकरण श्रीलंकेच्या घनदाट जंगलातले आहे.
संवाद उत्कृष्ट आहेत. उदा. छावणी बद्दल शिअर्स निकोलसला म्हणतो, ’Here is no civilisation.' 'Then we have a chance to introduce it.' निकोलस उत्तरतो.
सिनेमातले दोन हेकेखोर अधिकारी (निकोलस आणि सायटो) दोन वेगवेगळ्या संस्कृती मधला संघर्ष दाखवता्त.पराभूत झाले तर हाराकिरि असे मानणाऱ्या संस्कृतीचा सायटो निकोलसला म्हणतो,’I hate the British. You are defeated, but you have no shame. You are stubborn, but have no pride. You endure, but you have no courage.'
प्रत्यक्षात त्या दोहोत कितीतरी साम्य आहे. तोच अहंकार, कामावरची निष्ठा (छावणीतुन पळुन जाण्याबाबत निकोलस म्हणतो,’वरिष्ठांनी आज्ञा दिल्यामुळे मी शरणागती पत्करली आहे, त्यामुळे पळुन जाणे हा आज्ञाभंग होईल.)
निकोलस पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत जागरुक आहे, त्याबाबतीत तडजोड करायला तो तयार नाही. दुसरा एक युद्धकैदी डॉक्टर क्लिप्टन (जेम्स डोनाल्ड) निकोलस ला जेव्हा विचारतो कि ’शत्रुसाठी इतका दर्जेदार पुल तयार करणे म्हणजे, स्वराष्ट्राशी बेइमानी नव्हे काय?’ निकोलस त्याला सांगतो कि या पुलामुळे त्याची बटालियन परत एकदा सैनिक असल्यागत वागु लागली आहे,ते जे काही करत आहेत त्याचा त्यांना अभिमान वाटतो,’One day the war will be over. And I hope that the people that use this bridge in years to come will remember how it was built and who built it. Not a gang of slaves, but soldiers, British soldiers, Clipton, even in captivity’
युद्ध काळातही त्याचा आशावाद कायम आहे.
चित्रपटाला ८ ऑस्कर नामांकने मिळाली होती. त्यातील फ़क्त सहकलाकाराचे सेसुइ हायाकावा (कर्नल सायटो) सोडुन इतर सर्व ऑस्कर मिळालीत.
१. सर्वोत्कृष्ट चित्रपट
२. सर्वोत्कृष्ट कलाकार - एलेक गिनीस
३.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - डेव्हीड लीन
४. इतर भाषेतील कथानकावर आधारित सर्वोत्कृष्ट पटकथा - (मुळ कथानक फ़्रेंच)पीअरे बाउलो
५. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफ़ि
६. सर्वात हिट सिनेमा
७. सर्वोत्कृष्ट संकलन.


जाता जाता:
द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय मध्ये युद्धाची निरर्थकता दाखवताना हिंसाचार कमीत कमी दाखवला आहे, इथे जे.पी. दत्ताच्या बॉर्डर ची (सनी देओल) आठवण येते, ३ तास आपला मनसोक्त हिंसाचार दाखवुन जे.पी. गाणे ऐकवतात ,’मेरे दुश्मन मेरे भाई....यह जंग ना होने पाए.’ जे.पी. ना काय सांगायचे हे मला आजतागायत कळले नाही. त्यांना तरी कळले असेल?